स्त्री उन्नतीचे पुरस्कर्ते :डॉ. बाबासाहेब आंबेडकर
समाजात पुरुषप्रधान संस्कृतीमध्ये स्त्रियांना दुय्मम स्थान होते. स्त्रियांना प्रत्येक अधिकारापासून वंचीत ठेवल्या जात. स्त्री ही जन्मताच कपटी, धूर्त, लबाड अश्या कितीतरी पालुपदाने तिला नेहमीच अपमानित केले जात. काहींना ती अध्यात्म मार्गातील धोंड वाटली तर काहींना अविवेकी, चरित्रहीन, बस एवढीच तिची ओळख होती. चूल आणि मुलं एवढंच तीच विश्व् असतांना स्त्री उद्धारक महात्मा जोतिबाफ़ुलेंनी व सावित्रीबाईंनी तिला तिच्या अस्तित्वाची खरी ओळख करून दिली. समाजाच्या विरोधाला न जुमानता तिला तिच्या यशाचे मार्ग खुले करून दिले. त्यानंतर त्यांच्याच विचारांनी प्रभावित होणारे एक थोर भारतीय विचारवंत, भारतीय घटनेचे शिल्पकार, भारतीय समाज क्रान्तीचे मुकुटमणी, दलितोद्धारक डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे सुद्धा स्त्रीमुक्तीचे पक्के समर्थक होते.समाजाची उन्नती ही त्या समाजातील स्त्री पुरुष समानतेवर आधारलेली असून कोणतीही एक बाजू कमकुवत असल्यास समाजाची प्रगती ढासळते असं त्यांचं स्पष्ट मत होतं. त्यामुळे समाजात स्त्रियांच्या विकासाकडे अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याची भूमिका त्यांनी मांडली. ते स्त्रीशिक्षणाचे कट्टर पुरकर्ते होते. भारतीय समाज व्यवस्थेतील विषमता, स्त्री पुरुष असमानता, स्त्रियांवर होणारे अन्याय अत्याचार, त्यांच्यावर बळजबरीने लादलेले विवाह, कमी वयात लादलेले मातृत्व यामुळे त्याचे मन अस्वस्थ होतं. अश्या या सर्व जोखडी अवस्थेतून स्त्रियांना बाहेर पडायचं असेल तर तिने शिक्षित व्हायला हवं, तोच त्यांच्या उन्नतीचा खरां मार्ग होय. असा संदेश त्यांनी आपल्या व्याख्यान व लेखणीतून दिला. स्वतंत्र भारताचे पहिले मजूरमंत्री असतांना स्त्रियांच्या बाजूनी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यामध्ये कामगार स्त्रीला प्रसूती रजा, काम करणाऱ्या स्त्रियांना पुरुषांबरोबरची मजुरी, बहुपत्नी विवाहाला पायबंदी तसेच स्त्रियांना 21दिवसाच्या किरकोळ रजा, प्रसूती रजा मिळवून देण्याची तरतूद करून दिली. स्त्रियांना प्रसूती रजा मिळवून देणारे जगातील ते पहिले व्यक्ती होते. त्यानंतर अनेक देशांनी महिला प्रसूती रजा आपल्याही देशात लागू केल्या. स्त्रियांच्या अंत्यत संवेदनशील काळातील ही प्रसूती रजा तिच्यासाठी जणू पर्वणीच ठरली आहे. स्त्रियांवरील हे उपकार कोणतीही भारतीय नारी विसरू शकणार नाही. त्यामुळे तिला मातृत्वाचा पुरेपूर आंनद घेता आला यासाठी ती सदैव त्यांची ऋणी राहील. स्त्रियांच्या समान हक्क कायद्यासाठी त्यांनी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले त्यापैकी एक म्हणजे 1947मध्ये कायदेमंत्री असतांना त्यांनी हिंदू कोड बिलाचा महत्वपूर्ण प्रस्ताव लोकसभेत मांडला ज्यामध्ये स्त्रियांच्या न्याय हक्कासंबंधीच्या तरतुदी करण्यात आल्या होत्या.स्त्रियांना मुलं दत्तक घेता येत नव्होते, तिला वारसाहक्कापासून वंचीत ठेवल्या जात, तिला घटस्फोट घेण्याचा अधिकार नसल्यामुळे ती असाह्य जीवन जगत होती. अशी स्त्रियांची दैनीय अवस्था असतांना त्यांना पाठबळ देणारे हिंदू कोड बिल त्यांनी लोकसभेत मांडला त्यामध्ये अस्पृश्यतेचे उच्चाटन, लग्नसंबधातील स्त्रीपुरुष समानता, स्त्रियांना घटस्फोटाचा अधिकार, वारसाहक्क, मतदानाचा हक्क, दत्तक घेण्याचा अधिकार यासारखे अनेक स्त्री उद्धारक तरतुदी करण्यात आल्या होत्या. पण तिथेही हिंदू कोड बिल पास करण्यास विरोध झाला. त्यामुळे त्यांनी कायदेमंत्री पदाचा राजीनामा दिला. यावरून हे लक्षात येते की ते स्त्रीहक्काचे किती समर्थक होते.
बाबासाहेबांनी आपल्या प्रत्येक चळवळीत स्त्रियांना पुरुषांबरोबरीने सहभागी केलं होते. मग तो 1927चा महाडचा चवदार तळ्याचा सत्याग्रह असो , अथवा 1930चा नाशिकचा काळाराम मंदिर सत्याग्रह किंवा 1942ची नागपुरातील महिला परिषद असो या सर्वच चळवळीमध्ये त्यांनी महिलांना हिरहिरीने सहभागी करून घेतले यावरून हे लक्षात येते की महिलांनाही पुरुषांच्या बरोबरीत त्यांनी कमी लेखले नाही. समाजमध्ये बालविवाह अस्तित्वात होती. देशातील लग्नपद्धिती अत्यंत घातक होती.जठरविवाह पद्धतीमुळे.
बळजबरीने कमी वयाच्या मुलीशी तिच्यापेक्षा तीनपटीने मोठया असलेल्या पुरुषाशी लग्न करून दिल्या जात होते. ती मनाने, शरीराने कमजोर पडली असतांना तिच्यात आत्मशक्तीची फुंकर बाबासाहेबांनी घातली. तिचे मनोध्येर्य वाढविले. स्त्रीच कमी वयात लग्न करणे म्हणजे तिच्या प्रगतीत खूप मोठी अडचण निर्माण करणे होय. त्यामुळे स्त्रियांनी आपल्या हक्क अधिकारासाठी स्वतः पुढे यायला पाहिजे असं पडखड मत त्यांनी समाजासमोर मांडले.यामागे फक्त दलित स्त्रियांचा उद्धार करणे एवढाच उद्देश नसून संपूर्ण स्त्री जातीला उन्नतीच्या मार्गावर नेण्याचा, तसेच त्यांचा बौद्धिक, आर्थिक, मानसिक विकास करणे व तिला न्याय अधिकाराचे पाठबळ मिळवून देणे हा होता. स्त्री सक्षमीकरणाचे मार्ग त्यांनी मार्ग दाखविले. आज स्त्रिया अनेक क्षेत्रात झेप घेत आहे. स्त्रियांना पुरुषांच्या बरोबरीने हक्क प्राप्त झालेले आहेत. तेव्हा त्यांच्या या मौलिक कार्याला पुन्हा एकदा उजाळा देत, त्यांच्या जयंतीनिमित्याने डॉ. बाबासाहेबांना शतशः अभिवादन व कोटी कोटी प्रणाम !
प्रा. वैशाली रितेश देशमुख
कुही, नागपुर
7420850376
--
Sent from Amizapp EasyMail
Comments
Post a Comment